राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्थांनी आपल्या स्तरावरील अनुकंपा प्रकरणांची आवश्यक पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
प्रलंबित प्रकरणे विहित कालावधीत निकाली काढण्यासाठी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबांसाठी हा लाभ अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व संबंधितांनी कालबद्ध आणि समन्वयाने काम करून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहनही संचालक (योजना) श्री. पाटील यांनी केले आहे.
















