
फॅक्ट-चेकिंग संस्थांही सर्व फॅक्ट्स पडताळत नाहीत. त्यामुळे पूर्वग्रह असू शकतो. ‘एआय’मधील बायस हा आज जागतिक पातळीवरील मोठा प्रश्न आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, ‘एआय’ हे सत्याचा स्रोत नाही. ते माहितीचे स्वरूप बदलू शकतात, सारांश देऊ शकतात, पण ते सत्य ठरवू शकत नाही. नव्या पिढीचे टूल्स (उदा. रिअल-टाइम सर्च करणारी AI) अनेक स्रोतांमधून माहिती गोळा करून त्वरित सारांश देऊ शकतात. हे पत्रकारांना त्वरित संदर्भ देऊन रिपोर्टिंग सोपे करतात; परंतु या माहितीचे स्रोत तपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मिळालेल्या संदर्भांवर मानवी पडताळणी नसतानाही निष्कर्ष देणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मानवी नियमन आणि पडताळणी अनिवार्य असावी, असे त्यांनी ठळकपणे नमूद केले.















