Home महाराष्ट्र कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

0
कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
Agricultural universities should upgrade traditional indigenous seeds: Governor Acharya Devvrat's instructions to agricultural universities

मुंबई: जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन  राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले.

लोकभवन मुंबई येथून कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.

बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे,  ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संकरीत बियाणे शेतकऱ्यांसाठी संकट असून ते महाग देखील आहे. त्यांचा वापर केल्यास रासायनिक खते देखील जास्त लागतात.  उत्पादित अन्नधान्याला चव नसते व त्याचे पोषणमूल्य देखील कमी असते.  त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक बियाण्यांवर संशोधन करुन त्याचे उन्नतीकरण करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसारासाठी ‘मॉडेल फार्म’ विकसित करावे व शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असे राज्यपालांनी सांगितले. नैसर्गिक शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नैसर्गिक शेती हे पवित्र असे ईश्वरी कार्य आहे. भावी पिढ्यांच्या अन्नसुरक्षेसाठी जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय गत्यंतर नाही. बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे असेही राज्यपालांनी सांगितले.

गुजरात मधील चार कृषी विद्यापीठे गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक शेती या विषयावर संशोधन करीत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी त्या विषयावर नव्याने संशोधन सुरु न करता गुजरातमधील संशोधन पुढे न्यावे. त्यांनी तयार केलेल्या संशोधन पत्रिका व पुस्तके राज्यातील विद्यापीठांना  उपलब्ध करून देऊ असे राज्यपालांनी सांगितले.

आपण अलीकडे गावागावांमध्ये जाऊन लोकांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करीत आहोत, असे राज्यपालांनी सांगितले. अशाच एका भेटीमध्ये आणंद जिल्ह्यात २५ गावांमध्ये आज भूमिगत जलस्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले असून पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, ही गोष्ट निदर्शनास आली. दूषित पाण्यांमुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत. या दृष्टीने रसायनांच्या वापराबाबत जागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याकडे एक गाय असली तरी देखील शेती करता येते हे त्यांना पटवून द्यावे लागेल.      महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर आदी देशी गायींचे संवर्धन केले गेल्यास ते शेतीला वरदान ठरेल व  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असेही राज्यपालांनी सांगितले. यावेळी ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर यांनी सादरीकरण केले.

आपण महाराष्ट्रात नैसर्गिक शेती विषयावर घेतलेल्या दोन परिसंवादानंतर कृषी विभाग व विद्यापीठांनी हे कार्य सकारात्मक पद्धतीने हाती घेतले याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here