
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेली गोळीबाराची घटना कोणत्याही संघटित टोळीच्या कारवाईचा भाग नसून गैरसमजातून घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत निवेदन करुन मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 7 मार्च 2026 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील अलमास कॉलनी परिसरात नदीम मोईनुद्दीन खान यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर शहाबाज उर्फ शबू मुन्ना शमशाद कुरेशी आणि एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. नदीम खान हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून त्यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरोपी आचार गल्ली परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने पोलिसांवर आणि जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यास पकडले. या घटनेत जखमी इसमांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून दोन पिस्तुल, काडतुसे, मॅगझिन तसेच वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर तसेच मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध दिल्लीमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र कायद्यांतर्गत सुमारे 12 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तो ऑगस्ट 2025 मध्ये तिहार कारागृहातून जामिनावर सुटून काही महिन्यांपासून मुंब्रा येथे राहत होता. नदीम खान यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा गैरसमज झाल्यामुळेच आरोपीने हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे.
या घटनेत कोणत्याही टोळीचा सहभाग अद्याप आढळलेला नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंब्रा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली असून ‘सुरक्षित ठाणे’ ॲपद्वारे देखील अधिक दक्षता घेतली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ठाणे पोलीस आयुक्तांना विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.















