
कोंडगे(प्रतिनिधी):-लांजा तालुक्यातील कोंडगे गावची
पालटोक धनगरवाडी येथील शाळा मंजूरी होवून पाच ते सहा वर्षे झाली. जूनी शाळा पाडून नवीन शाळेसाठी त्या जागेवर चरी खोदण्यात आली आणि बांधकाम करण्याच्या वेळेस कोन्ट्रॅक्टर ती शाळा न बांधकाम करता अर्धवट सोडून गेला तो अध्याप मागे फिरकलाच नाही. शाळा जागेवर तशीच राहीली आणि मुले मात्र लोकांच्या दारी उघड्यावर शाळा शिकू लागली. या प्रश्नावर युवा नेतृत्व करणारे सचिन बेर्डे आक्रमक होवून प्रशासनला थेट सवाल करत आहेत. “मंजूर झालेल्या शाळेचं नेमकं झालं तरी काय?” पालटोक धनगरवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 येथे सचिन बेर्डे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिली. शाळेची कायमस्वरूपी इमारत जागे वरती उपलब्ध नसल्याने विद्यार्थी एका घराच्या अंगणात उघड्या वरती शिक्षण घेत असल्याने त्यांच्या दृष्टीस दिसून येताच त्यांनी प्रशासनला धारेवर धरून जाब विचारण्याचा ठाम निर्णय केला. यावेळी त्यांनी सरकार आणि प्रशासनाला थेट सवाल केला आहे.
“पालटोक धनगरवाडीची शाळा मंजूर झाली होती, मग ती आजपर्यंत उभी का राहिली नाही?”
“मंजुरीनंतर खोदकाम झाले पुढे ती शाळा कुठे गेली ? त्या शाळे वरती पुढे कोणती प्रक्रिया झाली? काम का झाले नाही? निधी, प्रस्ताव आणि निर्णयांचे नेमके काय झाले?” “या विद्यार्थ्यांनी अजून किती वर्षे स्वतःच्या शाळेची वाट पाहायची?”
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा देणे ही शासनाची जबाबदारी नाही का?” असे अनेक प्रश्न त्यांनी प्रशासनकडे उपस्थित केले आहेत. बेर्डे यांनी पंचायत समितीच्या बीडीओंशी दूरध्वनीवर चर्चा करून तातडीने कारवाईची मागणी केली. त्यांच्या चर्चेनंतर प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेर्डे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की “हा प्रश्न राजकारणाचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही; पण सरकारने आणि संबंधित प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट सांगावे—पालटोक धनगरवाडीची मंजूर शाळा आजपर्यंत का उभी राहिली नाही? त्या शाळेचा नेमका निधी कुठे गेला कुठे वापरला त्याच मला स्पष्टीकरण संबधीत खात्याने द्यावं जर काहीशाळा बांधण्यास अडचणी असतील, तर त्या जाहीर कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू नये.
ते पुढे म्हणाले,
“आज हे विद्यार्थी ज्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत, ती कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट असू शकत नाही. भाषणांत शिक्षणाला प्राधान्य दिले जाते, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शाळाच नसेल तर त्या घोषणांचा अर्थ तरी काय?”
जर का शाळेच्या विषयाचा मला योग्य तो खुलासा नाही मिळाला तर येत्या 15 ऑगष्टला जन आंदोलन करू असा इशारा दिला आहे.”15 ऑगस्टपर्यंत या शाळेबाबत ठोस निर्णय जाहीर करावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू. आम्हाला आश्वासने नकोत; आम्हाला उत्तर हवे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची शाळा हवी आहे.” या निर्णयावर मी कायम स्वरूपी ठाम असल्याचे बेर्डे यांनी सांगितले.















