अमरावती: गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
इंधन टंचाईबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडून घाबरून जाऊ नये. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. इंधनाची साठवणूक करण्यात येऊ नये. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
इंधन कंपन्यांच्या आजच्या सद्यस्थितीनुसार इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि नायरा या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू आहे. भारत पेट्रोलियमकडे पेट्रोल 400 केएल, डिझेल 450 केएल, हिंदुस्थान पेट्रोलियमकडे पेट्रोल 320 केएल, डिझेल 284 केएल, इंडियन ऑईलकडे पेट्रोल 500 केएल, डिझेल 550 केएल, नायराकडे पेट्रोल 385 केएल, डिझेल 275 केएल इंधनसाठा आहे.
इंधनाबाबत काही अडचण असल्यास संपर्क अधिकारी जाहिर करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियमसाठी रवी चव्हाण 8879656582, हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी अंकित पटेल 9589257260, इंडियन ऑईलसाठी विलास डिग्रसे 9423585411, नायरासाठी आकाश मिश्रा 8530758369 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
यासोबतच पेट्रोल 533 केएल आणि डिझेल 742 केएल इंधन मार्गावर असून त्याचा पुरवठा देखील वेळेत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
















