सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला ‘चवदार तळे’ सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड (जि. रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्या’चा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
















