११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध देशांचे वाणिज्यदूत आणि अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. नव्या रस्त्यांचे जाळे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, बुलेट ट्रेन प्रकल्प, वाय-फाय सिटीज आणि स्मार्ट सिटी योजनेतून शहरांचे रूपांतर घडवले जात आहे. या कालखंडात तब्बल २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. रोजगारनिर्मिती, डिजिटल सेवांचा विस्तार आणि कृषी, उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणांनी सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
















