Home आरोग्य औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे...

औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे

0
It is necessary to increase the use of digital technology to make the pharmaceutical manufacturing process safer, more transparent and faster.

मुंबई : औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे मत  ‘नेक्सट जेन फार्मा ॲड’ या  चर्चासत्रात वक्त्यांनी व्यक्त केले.

बीकेसी येथील जिओ कनव्हेंशन सेंटर येथे आयोजित पल्स परिषदेत नेक्सट जेन फार्मा ॲड’  ‘मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावरील चर्चासत्रात भविष्यकालीन औषधनिर्मितीवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात देश-विदेशातील औषधनिर्मिती व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

या चर्चासत्रात नियामक सुधारणा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, उद्योग-शासन सहकार्य आणि रुग्णकेंद्रित धोरणे यांमुळे भारत जागतिक फार्मा क्षेत्रात अधिक मजबूत स्थान मिळवू शकतो, असा विश्वास  सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.

चर्चासत्राच्या सुरुवातीला औषध उद्योगातील वेगाने होत असलेल्या बदलांचा आढावा घेण्यात आला.

या चर्चेत सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्ग्नायझेशन चे प्रतिनिधी डॉ. संतोष व्ही. इंद्राक्षा यांनी भारतातील औषध नियामक प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रभावकारिता यावर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. डिजिटल ट्रॅकिंग आणि डेटा-आधारित तपासणी प्रणालीमुळे नियमन प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर ॲस्टेलास फार्मा च्या नेहा द्विवेदी यांनी औषध उद्योगात मार्केट अॅक्सेस म्हणजेच रुग्णांपर्यंत औषधे पोहोचविण्याच्या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. संशोधनातून तयार होणारी नवी औषधे रुग्णांपर्यंत जलद आणि परवडणाऱ्या दरात पोहोचण्यासाठी उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच टाकेडा फार्मास्युटिकल कंपनी चे प्रभात सिन्हा यांनी भारतातील धोरणात्मक स्थैर्य आणि गुंतवणुकीसाठी तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणाचा उल्लेख केला. भारत जागतिक औषधनिर्मिती साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि संशोधन व उत्पादनासाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारताकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी Pfizer च्या प्रिथा कर बसुमलिक यांनी रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्थेवर भर दिला. औषधांची किंमत, विमा योजना आणि वितरण व्यवस्था सुधारल्यास रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकतील, असे त्यांनी सांगितले. डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म आणि डेटा अॅनालिटिक्समुळे रुग्णसेवा अधिक प्रभावी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वैद्यकीय उपकरणे आणि औषधनिर्मिती क्षेत्र यांच्यातील समन्वय भविष्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मेडट्रॉनिक चे रवी वालिया यांनी सांगितले. नवकल्पना संशोधन आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी वाढविल्यास आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल, असा त्यांचा विश्वास आहे.

चर्चासत्राचे अध्यक्ष सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजिस चे डॉ. राजीव छिब्बर यांनी सर्व वक्त्यांच्या मुद्द्यांचा आढावा घेताना भारतातील औषध व वैद्यकीय उपकरण क्षेत्रासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादन पद्धती यांचा अवलंब केल्यास भारत जागतिक स्तरावर अधिक सक्षम ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

या चर्चासत्रातून भारतीय औषधनिर्मिती उद्योगासाठी भविष्यातील दिशा काय असावी या अनुषंगाने औषधनिर्मितीतील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नियामक धोरणे, संशोधनातील गुंतवणूक आणि रुग्णांपर्यंत औषधांची उपलब्धता या विषयांवर विस्तृत चर्चा झाली.