नागपूर : जल व्यवस्थापन व बारव निर्मितीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिशादर्शक कार्य करुन योगदान दिले आहेत. त्यांनी दिलेले योगदान नव्यापिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्मितीसाठी जलसंपदा विभागाने गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा अभियान अत्यंत आवश्यक आहेत. या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पेंच व सूर नदीतील पवित्र पाण्याचा कलश संकलित करुन तो श्री क्षेत्र महेश्वरकडे रवाना होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानास शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात जलसाक्षरतेच्या उद्देशाने 25 ते 29 एप्रिल या कालावधीत गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्राचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी व गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून ही यात्रा एकाचवेळी सुरु होत आहे. महाराष्ट्रातील 30 विविध नदी खोऱ्यातील नद्यांचे पवित्र जल संकलित करुन याद्वारे पाणी प्रश्नाप्रती जागर केला जाईल. राज्यातील सुमारे 500 जलयात्री यात सहभागी होत आहेत. हे जल व चोंडी येथील पवित्र माती कलशात घेऊन शिर्डी येथे सर्व एकत्रित केले जाणार आहे. तेथून श्री क्षेत्र महेश्वर येथे हे जल रवाना करण्यात येईल.
नागपूर शहराला पाणी पुरवठ्यासह सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राला सिंचीत करणाऱ्या पेंच नदीच्या पवित्र पाण्याचा जलकलश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या नागपूर येथील मुख्य अभियंता सोनाली चोपडे यांना सुर्पूद करण्यात आला. याचबरोबर राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते रामटेक येथून वाहनाऱ्या सूर नदीचे पवित्र पाण्याचा कलश कार्यकारी अभियंता अनिता पराते यांच्याकडे सुर्पूद करण्यात आला. यावेळी मौदा नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके व पदाधिकारी उपस्थित होते.
















