Home सरकारी योजना कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे...

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील

1
Officials should work in a people-oriented manner, maintaining speed and transparency in work – Guardian Minister Vikhe Patil

अहिल्यानग: “शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने व लोकाभिमुख होऊन काम करावे,” असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. श्रीगोंदा येथील ‘माऊली’ संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, श्रीगोंद्यात वनविभागाची मोठी जमीन विनावापर पडून आहे. या जमिनीचा वापर जनहिताच्या विकासकामांसाठी करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव त्वरित पाठवावा. तसेच, संगमनेरच्या धर्तीवर श्रीगोंद्यातही ‘लेपर्ड रेस्क्यू सेंटर’ (बिबट्या निवारा केंद्र) उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा.

तालुक्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी ‘पोलिसिंग’ सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गरज पडल्यास नवीन पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे मिळायलाच हवीत. जर कोणी यात काळाबाजार करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना ते म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा हवा आणि महिलांच्या प्रसूतीसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असायला हव्यात.
​वीज, पाणी आणि घरकुल
शासनाच्या ‘सोलर’ योजनांवर भर देऊन शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तसेच, घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून बेघरांना हक्काचे घर मिळवून द्यावे. शहरात महिला व ज्येष्ठांसाठी सर्व सोयींनी युक्त असे सुसज्ज उद्यान उभारावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

​बैठकीत महसूल, कृषी, वीज, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.