(नंदुरबार) मागासवर्गीय मुलींची शासकीय निवासी शाळा, होळ तर्फे हवेली येथे ‘सामाजिक समता सप्ताहा]चे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त मानवी हक्कांचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी विवेकानंद चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर मुख्य व्याख्याते म्हणून राजेंद्र पिंपळे उपस्थित होते.
यावेळी मुख्य व्याख्याते राजेंद्र पिंपळे यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांवर प्रकाश टाकला. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी या सत्याग्रहाचा इतिहास आणि त्यातून अधोरेखित झालेले मानवी हक्क व सामाजिक समतेचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मागासवर्गीय मुलींची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बागुल, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनाक्षी दांडवेकर आणि समतादूत टीमच्या सारिका दहीवेलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, निवासी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
















