उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात दुर्धर आजारांचे लवकर निदान, कमी खर्चाची उपचार पद्धती विकसित करणे आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पल्स वैद्यकीय परिषदेत केले. ही परिषद राज्याच्या वैद्यकीय धोरणाला आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला नवे दिशा-दर्शन मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, या सेवा नागरिकांच्या निवासस्थानापासून आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (#एआय) प्रभावी वापर करण्यावर राज्य शासनाचा विशेष भर असून, यामुळे आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवताना गुणवत्ताही टिकवून ठेवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
डिजिटल आरोग्य बळकट करणे, ग्रामीण-शहरी दरी कमी करणे आणि महाराष्ट्राला जागतिक वेलनेस केंद्र बनविण्याच्या दिशेने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असून, महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची सद्याची स्थिती व भविष्यातील दिशा दर्शवते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर वैद्यकीय शिक्षण व उद्योग क्षेत्राच्या समन्वयाने आरोग्य सेवा पुरविण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्राच्या सकारात्मक भविष्यनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘पल्स वैद्यकीय परिषद २०२६’ ही केवळ परिषद नसून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनाचा रोडमॅप आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
















