
नंदुरबार(प्रतिनिधी):-गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी आज आदिवासी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा आणि पात्र कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करू नये, अशी ठाम भूमिका आदिवासी युवा सेनेने मांडली.















