अमरावती : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज, दि. 7 फेब्रुवारी रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी आणि पदभ्रमंती केली. त्यासोबतच जिल्हाधिकारी यांनी मोझरी पाँईट येथून गाविलगड किल्ला पायी चढण्याचा अनुभव घेतला. त्यांनी सुमारे सहा किलोमीटर ट्रेकिंग करत दरीतून चढण्याचा थरारक अनुभव घेतला.
जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी या विशेष ‘ट्रेकिंग’ मोहिम घेण्यात आली. निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय प्रवास असलेला ‘मेळघाट ट्रेकिंग अनुभव’ या मोहिमेत सहभागी झालेल्यांना मेळघाटातील घनदाट जंगले आणि हिरव्यागार दऱ्यांचा थरार जवळून अनुभवता आला. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट निसर्गाशी नाते जोडणे आणि दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळवणे असा होता.
आज सकाळी 6 वाजता मोझरी गावातून पदभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. सहभागी पदभ्रमंती करून सकाळी 9 वाजता किल्ल्यावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व संवर्धनाबाबत सविस्तर माहिती घेतली.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरकराव, उपवनसंरक्षक अग्रिम सैनी, चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोराणकर, अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन सहारे, जिल्हा प्रशासन अधिकारी विकास खंडारे, चिखलदराचे नायब तहसीलदार सुधीर धावडे, प्रवीण काळे व तुषार बुरघाटे, चिखलदरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाळ, सहायक वनसंरक्षक अक्षय तळपे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. युवनाते, वनपाल विनोद कासदेकर, वनरक्षक मयूर सानप, श्री. मलवार, श्री. बोरकर, मनीष ढाकुलकर उपस्थित यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. या मोहिमेचे नियोजन विभागीय वन अधिकारी अनंत डिगोळे यांनी केले.
मेळघाटच्या कुशीत हरवायला, निसर्गाशी नाते जुळवायला आणि आठवणींचा ठेवा जमवायला हा एक सुवर्णक्षण असल्याची भावना सहभागींनी नोंदविली. यावेळी शिवा काळे यांनी गाविलगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, महत्त्व व संरक्षणाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. ही पदभ्रमंती ऐतिहासिक वारसा जतन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
















