Home नंदुरबार जिल्हा जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया

0
Let us carry forward the mission of water conservation through a people's movement.

(नंदुरबार) माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन नंदुरबार येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करत त्यांनी दिलेला जलसंवर्धनाचा वसा पुढे नेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भूजल पुनर्भरण, नाल्यांतील गाळ काढणे, वृक्षारोपण आणि पाणी बचतीच्या उपक्रमांना लोकसहभागाची जोड देऊन जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.

जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने नंदुरबार येथील जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील जी.टी.पी. कॉलेजचे उपप्राचार्य मनोहर पाटील, संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी, युवक, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांनी केले. त्यांनी जलसंधारण उपक्रमांची गरज आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला.

जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने ‘वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पाणी बचत आणि जलसंवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविणे हा यामागील उद्देश आहे.

पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण यावर सर्वांनी भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात भूजल पुनर्भरण, नाल्यांतील गाळ काढणे, पाणी बचत आणि जलस्रोत संवर्धन यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे आणि भूजल पातळी वाढविणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि पर्यावरण संवर्धन अधिक महत्त्वाचे झाले असून, यंदाच्या एल निनो वर्षाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी एकत्रितपणे वृक्षारोपण आणि पाणी बचतीचा संकल्प केला आहे.

सामूहिक शपथ व वॉकथॉनचा उत्साह

कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेत पाणी आणि माती संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी 7 वाजता ‘वॉक फॉर वॉटर’ रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत विद्यार्थी, युवक, नागरिक आणि अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जलसंवर्धनाचा संदेश दिला.

स्पर्धा व सन्मान

कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस, सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी योगदान

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जी. टी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचारी, शहर पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच मृद व जलसंधारण विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी विशेष परिश्रम घेतले.

वॉकथॉनचा मार्ग व समारोप

जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावरून सुरू झालेली रॅली अंधारे स्टॉप, नेहरू चौक, महाराणा प्रताप चौक, मार्केट रोड मार्गे खोडाईमाता मंदिर असा प्रवास करून पुन्हा महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाली.

सकाळी 6 वाजता उपस्थिती, 6.15 वाजता वॉर्म-अप, 6.45 वाजता शपथ, 7 वाजता रॅली प्रारंभ आणि 8 वाजता समारोप असा कार्यक्रमाचा क्रम होता. त्यानंतर 8.30 वाजता पारितोषिक वितरण व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून पाणी बचत, भूजल पुनर्भरण, वृक्षारोपण आणि जलस्रोत संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचविण्यात आला. जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देत शाश्वत आणि जलसमृद्ध भविष्य घडविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक माधव कदम व मनोज शेवाळी यांनी केले.