
युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा ‘विकसित भारत’ आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा ‘विकसित महाराष्ट्र’ घडेल, असा विश्वास त्यांनी रॅलीला मार्गदर्शन करताना व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार १५ ऑगस्टपर्यंत देशाच्या प्रत्येक शहर, गावात आपली राष्ट्रभक्ती प्रगट करण्याकरता तिरंगा हाती घेऊन तिरंग्याची शान दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले.
तिरंगा केवळ झेंडा नसून देशभक्तीचे प्रतीक आहे. आपल्या मनात आणि जीवनात आहे. तो हाती घेतला तर आपल्याला अधिकार, कर्तव्य लक्षात ठेवावे लागतात. संविधानाने अधिकारासोबत आपल्यावर काही कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारीही टाकली आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. प्रधानमंत्री मोदींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित महाराष्ट्र उभा करायचा आहे. पुणे महाराष्ट्राची विद्यानगरी, महाराष्ट्राची नवोन्मेषाची नगरी तसेच महाराष्ट्राची उद्योग नगरी आहे. पुण्यनगरी भारताचं एक सांस्कृतिक बलस्थान आहे. या पुण्याच्या युवाशक्तीच्या भरवशावर उद्याचा भारत आपण पाहणार आहोत, तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले प्राण दिले. तिरंगा आणि देशासाठी अनेक सैनिक प्राण देतात. हा तिरंगा हाती घेतल्यावर आपल्यावर देशसेवेची जबाबदारी आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ललित चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला आणि फर्ग्युसन महाविद्यालय मार्गाने पुढे जात छत्रपती संभाजी महाराज चौकात समारोप झाला. यावेळी दुतर्फा उभे राहून नागरिक, विद्यार्थी वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणा दिल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार रवींद्र चव्हाण, उमा खापरे, अमित गोरखे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, शंकर जगताप यांच्यासह लोकप्रतिनिधी, नागरिक, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















