Home महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आदिवासी समाज नव्या तेजाने उभा – मुख्यमंत्री देवेंद्र...

मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आदिवासी समाज नव्या तेजाने उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Tribal community has emerged with new vigor due to the large number of opportunities – Chief Minister Devendra Fadnavis

नागपूर:- ‘आदिवासी बांधवांना शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हा समाज आता नव्या तेजाने उभा राहिला असून आता हा समाज मागे वळून पाहणार नाही’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मायाताई इवनाते यांनी संधीचे सोने करून समाजाच्या कायम स्मरणात राहील असे कार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

मायाताई चिंतामणराव इवनाते सत्कार समितीच्या वतीने राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मायाताई इवनाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार सुधाकरराव देशमुख, महापौर नीता ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मायाताईंनी अत्यंत संघर्ष करत आपली राजकीय कारकीर्द घडविली आहे. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर त्यांनी मोठे काम केले. अगदी देशपातळीवर फिरून त्यांनी त्यांचे असंख्य प्रश्न सोडवले. त्यामुळेच त्यांना देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आमच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. नगरसेवक, महापौर, केंद्रीय जनजाती आयोगाच्या सदस्या म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत निष्कलंक राहिलेली आहे. कुटुंबात घडलेल्या दुदैवी घटनेने त्या खचल्या नाहीत, तर त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेऊन आपल्या नेतृत्वाचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

राज्यात आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यापक स्तरावर काम होत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची सोय होत आहे. त्यांच्या परदेशातील शिक्षणासाठीही शासनाने तरतुदी केल्या आहेत. संधी मिळाली तर आदिवासी मुले संधीचे सोने करतात, हे त्यांनी आपल्या विविध कौशल्यांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. कुपोषण मुक्तीच्या कार्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

शिक्षणातूनच समाजाची प्रगती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

समाजात ज्ञानाचा प्रसार होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. आदिवासी समाजाची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. संपूर्ण समाज विकासाच्या या यात्रेत सहभागी होईल, तेव्हा त्या समाजाला दिशा देण्याचे कार्य मायाताईंसारख्या नेतृत्वाला करावे लागेल. समाज आज त्यांच्याकडे अत्यंत आशेने पाहतो आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केले.

मायाताईंचे जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत आणि संघर्षात गेले असा उल्लेख करुन श्री. गडकरी म्हणाले, त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक जबाबदारीचा वापर त्यांनी सामाजाच्या कल्याणासाठी केला आहे. त्यांच्या नेतृत्वात समाज आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

हा सन्मान माझ्या समस्त आदिवासी बांधवांचा – मायाताई इवनाते

आदिवासी समाजाचे दुःख आपण जवळून पाहिले आहे. समाजासाठी बरेच काही करायचे आहे. संसदेत त्यांची प्रतिनिधी या नात्याने त्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. देश बदलत असताना या बदलांमध्ये माझ्या आदिवासी बांधवांचा मोठा वाटा असेल, अशा भावना मायाताई इवनाते यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केल्या.

याप्रसंगी आदिवासी विकास युवा संघ, ट्रायबल इन्स्टिट्यूट अँड मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, संयुक्त आदिवासी कृती समिती, आदिवासी उडान बहुउ्ददेशीय संस्था, इंडिजिनिअस ट्रायबल वुमेन फोरम या संघटनांसह इतर विविध संघटनांच्या वतीने मायाताई इवनाते यांचा सत्कार करण्यात आला. या संघटनांचे पदाधिकारी आकाश मडावी, महेंद्र उईके, राजेंद्र मरस्कोल्हे, विवेक नागभिरे, प्रशांत कुमरे, विनोद मसराम, दिनेश शेराम, सदाराम गाते, आशा तुमडाम यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्यामल देशमुख यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. महेंद्र उईके यांनी आभार मानले.