मुंबई : चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.
सदस्य सत्यजित देशमुख यांनी चांदोली धरण परिक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री गणेश नाईक बोलत होते.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील जमीन मुळात चांदोली धरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेली बाजारपेठ नष्ट झाल्याने अनेक ग्रामस्थांनी येथे राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील एकूण ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी १९९९ च्या मूल्यांकनानुसार पुनर्वसनाचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. तथापि, सध्याच्या बाजारभावानुसार मोबदला वाढवायचा असल्यास मंत्रिमंडळाची संमती आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. पर्यायी जमीन देणे किंवा आर्थिक मोबदला देणे याबाबत निर्णय घेताना आजच्या बाजारभावाचा विचार केला जाईल, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.
















