Home महाराष्ट्र इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी...

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

2
State government is trying to complete the work of Dr. Babasaheb Ambedkar Memorial at Indu Mill by 2027

नवी दिल्ली : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम विहित मुदतीत आणि अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे असे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज येथे सांगितले.

श्री बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गाझियाबाद येथील प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली. इंदू मिल स्मारकासाठी तयार होत असलेल्या पुतळ्याच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि कामाच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेतला.

पाहणीनंतर महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीवर सविस्तर माहिती दिली. स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य धातूंच्या जागतिक दरात झालेल्या वृद्धीमुळे प्रकल्पाच्या मूळ निविदा दरांमध्ये आणि सध्याच्या वास्तविक खर्चामध्ये तफावत निर्माण झाली आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अतिरिक्त निधीची तातडीने तरतूद करणे आवश्यक आहे.या वाढीव निधी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमएमआरडीए मार्फत संबंधिताना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती शासन स्तरावर केली जाईल असेही श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

स्मारकाच्या प्रगतीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, इंदू मिल येथे 350 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत असून, त्यापैकी साधारण 50 फूट उंचीचे काम (बूट आणि पँटचा भाग) पूर्ण झाले आहे. उर्वरित सुटे भाग तयार करण्याचे व ते जोडण्याचे काम शिल्पकार अनिल सुतार यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर सुरू आहे. सन 2027 पर्यंत हे स्मारक पूर्ण करून अनुयायांसाठी खुले करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. हे स्मारक जागतिक स्तरावर एक महान श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.