Home महाराष्ट्र कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री...

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Mahameru of achievement: Narayan Rane is a beacon of bold leadership and guidance – Chief Minister Devendra Fadnavis

सिंधुदुर्गनगरी :- “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून मला शाबासकी दिली, ते नारायण राणे साहेब माझ्या राजकीय वाटचालीत सदैव मार्गदर्शक राहिले आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कणकवली येथे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राणे साहेबांच्या संसदेतील आणि विधानसभेतील अभ्यासू वृत्तीचा गौरव करताना सांगितले की, अर्थसंकल्पावर भाषण करताना राणे साहेब एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकड्यांची जी चिरफाड करायचे, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. माझ्या संसदीय यशाचे आणि मी लिहिलेल्या ‘बजेट कसं वाचावं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेयही राणे साहेबांच्या पुढाकारालाच जाते, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली येथे माजी मुख्यमंत्री,  खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्यासाठी  उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार दीपक केसरकर , आमदार रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, निलेश राणे आदी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या जीवनपटावर आधारित ‘तुफान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पार पडले.

राणे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, साहेब म्हणजे एक अत्यंत ‘दिलदार’ व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. त्यांच्या प्रत्येक कामात कमालीची शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य असते, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज आणि गोशाळा होय. साहेबांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नी नीलम ताई यांचा मोठा सहभाग असून, निलेश आणि नितेश राणे यांनी त्यांचा राजकीय वारसा योग्य प्रकारे पुढे चालविला आहे. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा ही साहेबांची ओळख असली, तरी त्यांच्या मनात कार्यकर्त्यांबद्दल आणि माझ्यासारख्या सहकाऱ्यांबद्दल नेहमीच मायेची ओढ राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले

या सोहळ्याला उपस्थित असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे साहेबांच्या जिद्दीचे कौतुक केले. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले तरी राणे साहेबांनी कधीही हार मानली नाही, उलट प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. एक प्रभावी आणि आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम असून, त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणांचा अभ्यास नवीन सदस्यांनी करायला हवा, इतके ते मार्गदर्शनपर असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, कोकणातील जनतेने राणे साहेबांना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे मान दिला आहे. त्यांच्या धाकातही माया आहे आणि मार्गदर्शनातही आपुलकी आहे. माझ्या राजकीय प्रवासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्यासारखा मार्गदर्शक लाभणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही त्यांनी नमूद केले.

खासदार सुनील तटकरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, वरवडे सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली राणे साहेबांची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. शाखा प्रमुखापासून ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा आदर्श नमुना आहे. त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची नवी ओळख मिळाली असून, मेडिकल कॉलेजसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याची प्रगती अधिक वेगाने झाली आहे. अशा या जननेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राणे साहेबांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे, त्यांना उभारी देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला प्रेरणा आणि दिशा मिळते. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक कार्यकर्ते आज आत्मविश्वासाने काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम राणे साहेबांनी केले असून, त्यांच्या स्पष्ट विचारांमुळेच या भागाचा कायापालट झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

खासदार नारायण राणे यांनी यावेळी अत्यंत भावनिक शब्दांत या गौरव सोहळ्यानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, आयुष्य हे केवळ यश-अपयशाचा प्रवास नसून, प्रामाणिक प्रयत्नांची एक अखंड साधना आहे. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड दिली, तर यश नक्कीच आपल्या पावलांशी येते. मी राजकारणात जे काही मिळवलं, ते कोणाच्या आधारावर नाही, तर माझ्या जिद्दीवर आणि कठोर परिश्रमांवर मिळवलं आहे. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, अनेक प्रसंगांना सामोरे गेलो, पण एक गोष्ट कधीच सोडली नाही—ती म्हणजे हार मानण्याची वृत्ती. संकटे आली, अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी नव्या उमेदीने उभा राहिलो. आज जे माझं कौतुक होत आहे, ते माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी अमूल्य संपत्ती आहे. हा सन्मान, हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श माझ्या आयुष्याचा आधार राहिला आहे. त्यांच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली. त्यांच्या शिकवणुकीतूनच मी माणुसकी, कर्तव्य आणि स्वाभिमान यांना सर्वोच्च स्थान दिलं आहे.  माझ्या आयुष्यात मी नेहमी माणुसकीला महत्व दिलं, कारण माणूस म्हणून जगणं हेच खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहा, लोकांच्या हिताचा विचार करा—यश तुमच्या पाठीशी उभं राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.