
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘वंदेमातरम्’च्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ तसेच महाकवी कालिदास जयंतीनिमित्त भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (CCRT), नवी दिल्ली आणि संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 अंतर्गत नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘शिरीषकुमार मेहता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात तरुण हुतात्मा’ या मराठी नाटकाचा प्रभावी प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सी सी आर टी नवी दिल्ली डेप्युटी डायरेक्टर श्री. विनोदजी इंदुरकर, निदेशक पप्पुंजय कुमार,उपनिदेशक डॉ. राहुलकुमार सीसीआरटी नवी दिल्ली यांच्या प्रेरणेने ‘भारत स्पीक्स थ्रू थिएटर’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव देशातील 19 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 40 शाळांमध्ये आयोजित करण्यात आला असून, भारतीय संस्कृती, साहित्य, रंगभूमी आणि ‘वंदे मातरम्’च्या प्रेरणादायी भावनेचा गौरव हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी नाट्यसंघाच्या सदस्याने कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानंतर उपस्थितांनी उभे राहून ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. त्यानंतर राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सादर करण्यात आले. मान्यवरांचे संदेश वाचून दाखवल्यानंतर नाट्यप्रयोगाची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि ‘शिरीषकुमार मेहता’ या नाटकाचा सुमारे 45 मिनिटांचा प्रभावी प्रयोग सादर करण्यात आला. देशभक्ती, त्याग आणि बलिदानाची प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांनी उत्कट अभिनयातून साकारल्याने प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना भरभरून दाद दिली.
या नाटकाचे दिग्दर्शन सीसीआरटी स्वयंसेवक तथा जिल्हा परिषद कन्याशाळा, प्रकाशा येथील प्राथमिक शिक्षक गोपाल होनजी गावीत यांनी केले.
नाटकानंतर कलाकारांचा परिचय करून देण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. समारोपाच्या सत्रात पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’चे गायन आणि त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग प्राथमिक उपशिक्षणाधिकारीनिलेश लोहकरे, एस. ए. मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी, स्वातंत्र्यसैनिक प्रल्हाद सोनार यांचे चिरंजीव सुनील सोनार, उप मुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जांभिलसा, ज्येष्ठ शिक्षक अविनाश सोनेरी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांचे उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय आणि दूरदृष्टी मोलाची ठरली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांनी संघभावनेने केलेल्या कार्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी प्रभावी शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार पाटील सर यांनी मानले. तसेच सीसीआरटी, संगीत नाटक अकादमी आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावरील या सांस्कृतिक उपक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक आणि यूट्यूबद्वारे करण्यात आले. तसेच पंतप्रधान कार्यालय, संगीत नाटक अकादमी आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाला कार्यक्रमाची माहिती प्रसारित करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावरील या महोत्सवात नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सादरीकरणामुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ओळख मिळाली असून, सहभागी विद्यार्थी, दिग्दर्शक गोपाल गावीत, प्राचार्या नूतनवर्षा वळवी, सूत्रसंचालक मनीष पाडवी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रसाद दीक्षित तसेच शिक्षकवृंद यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्यपरंपरेचा गौरव आणि ‘वंदे मातरम्’च्या राष्ट्रप्रेरणेचा संदेश देशभर पोहोचविणाऱ्या या महोत्सवाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.















