नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी घसरण झाली असून, कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.विशेषतः सातपुड्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागांमध्ये तापमान इतके खाली घसरले आहे की, दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.थंडीचा हा तीव्र प्रकोप पहाटेच्या वेळी अधिक जाणवत असून, सकाळी उघड्यावर असलेल्या पिकांवर गोठलेले दव स्पष्टपणे दिसून येत आहे.मोलगी परिसरातील डाब आणि वालंबा या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. आज सकाळी भाताच्या पेंढ्यावर साचलेले दवबिंदू पूर्णपणे गोठल्याचे दिसून आलेभाताच्या हिरव्या पेंढ्यावर पसरलेली ही गोठलेली दवबिंदूंची थर जणू काही बर्फाची पातळ चादर पसरल्याचा भास निर्माण करत होती.सातपुड्यासारख्या भागात सहसा बर्फवृष्टी होत नसली, तरी या दृश्याने नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.
तापमानातील या तीव्र घसरणीचा सर्वाधिक परिणाम आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये जाणवत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा जोर अधिक वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी गावागावांत शेकोट्या पेटवलेल्या दिसून येत असून, लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.अनेक ठिकाणी शेतकरी सकाळी लवकर शेतात जाणे टाळत असून, जनावरेही थंडीमुळे कुडकुडताना दिसत आहेत.काही भागांत पिकांवर दव गोठल्याने भाजीपाला आणि चाऱ्याच्या पिकांना नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
















