
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून ‘वंदे मातरम सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमावर आधारित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) डेप्युटी कमांडंट विजय चकोर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉन उपक्रमाअंतर्गत सीआयएसएफच्या ६५ सायकलपटूंचे पथक १० ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टी मार्गावर प्रवास करणार आहे. वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांच्या तस्करीविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच किनारी सुरक्षेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या सायक्लोथॉनच्या राज्यातील प्रवासादरम्यान तारापूर, गेटवे ऑफ इंडिया, कुरूळ, लोणेरे, अंजनवेल आणि रत्नागिरी येथे विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पथक पुढील प्रवासासाठी गोवा राज्याकडे रवाना होणार आहे. या उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी आणि रूपरेषा याविषयी विजय चकोर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमधून सविस्तर माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत मंगळवार, १० आणि बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ती ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे.















