
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नवीन १२ डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण आहे. त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसीस’ योजना सध्या विविध शासकीय रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात ९२ महाडायलिसीस केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत.
लोकार्पण होणाऱ्या केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. रत्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे.
‘महाडायलिसीस’ योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, http://mahadialysis.in या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपद्वारे माहिती व सेवा उपलब्ध आहे. रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.















