
महाराष्ट्रातील मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील मान्यवरांना पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी व खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पीयूष पांडे यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी नीता जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पद्मश्री पुरस्काराने जनार्दन बापुराव बोठे यांना सामाजिक कार्यासाठी, रघुवीर खेडकर यांना कला प्रकारातील तमाशा लोककलेसाठी, श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी, उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून संरक्षण क्षेत्र आणि खाणकाम उद्योगातील योगदानासाठी, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. जुझर वासी यांना सन्मानित करण्यात आले.
मूळचे पुण्याचे असलेले डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्याला संयुक्तपणे त्यांच्या छत्तीसगड राज्यामधील योगदानाबद्दल ‘पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली ३५ वर्षे त्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील बस्तर आणि अबू झमाडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य केले आहे.















