(नंदुरबार) पर्यावरणपूरक, सुंदर आणि राहण्यायोग्य शहराच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नंदुरबार’ अभियानाला आज नवापूर चौफुली परिसरातून हिरवी सुरुवात मिळाली. शहरातील प्रमुख मार्गांचे हरितीकरण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा.विकास खारगे, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी तसेच वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), नाशिक गजेंद्र हिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत नवापूर चौफुलीपासून विविध दिशांना जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यास, कार्बन शोषण वाढण्यास तसेच जैवविविधतेच्या संवर्धनास मोठी मदत होणार आहे.
उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, शिरस, अमलतास, जारूळ आणि निंब यांसारख्या स्थानिक वृक्षप्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांमुळे पक्षी, फुलपाखरे आणि इतर जीवसृष्टीला नैसर्गिक अधिवास उपलब्ध होऊन पर्यावरणीय समतोल अधिक बळकट होणार आहे.
‘हरित नंदुरबार’ ही केवळ वृक्षारोपण मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा व्यापक संकल्प आहे. वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी नागरिकांनाही या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक अपर्णा पाटील व स्नेहल अवसरमल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एक वृक्ष – अनेक पिढ्यांचे संरक्षण!
चला, ‘हरित नंदुरबार’च्या संकल्पाला बळ देत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पार पाडूया.
#HaritNandurbar#GreenNandurbar#TreePlantation#EnvironmentDay#SocialForestry#Nandurbar#EcoFriendlyCity#SustainableDevelopment#GreenInfrastructure#EnvironmentalConservation#Maharashtra#ViksitNandurbar#SaveEnvironment#PlantTrees#HaritMaharashtra![]()
![]()
![]()