
चंद्रपूर : राजमाता राणी हिराई ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा आहे. त्यांचा संघर्ष, पराक्रम आणि कर्तुत्वाची नवीन पिढीला ओळख व्हावी, यासाठी दरवर्षी राणी हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. एवढेच नाही तर चंद्रपूर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.
आदिवासी विकास विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि महानगरपलिकेच्या वतीने चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव परिसरात आयोजित राजमाता राणी हिराई जन्मोत्सवात उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ. वुईके बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गि-हे, गोंडराजे केशव शहा महाराज आत्राम तसेच नगरसेवक आदी उपस्थित होते.















