
(नंदुरबार) धडगाव तालुक्यातील दुर्गम त्रिशूल गावाने जलसंवर्धन आणि भूमि सुपोषणाचा आदर्श संकल्प करत शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. “जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ पार पडला.
या कार्यक्रमास मा. आमदार आमशादादा पाडवी तसेच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन व भूमिपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात त्रिशूल गावाची भौगोलिक परिस्थिती व जलतारा प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. आमदारांनी पाणी संवर्धनासोबत वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जल, जमीन आणि जंगल यांचे संवर्धन हेच शाश्वत शेतीचे आधारस्तंभ असल्याचे सांगत, गावकऱ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. तसेच वॉटर बजेटिंग, मृदसंवर्धन व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन पूर्णतः सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी जलतारा प्रकल्पाची वैज्ञानिक माहिती देत भूजल पुनर्भरण, मृदसंवर्धन आणि पोषण वाटिकेद्वारे कुटुंबाच्या आरोग्यवृद्धीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, १००० जलतारा प्रकल्प राबविण्याचा संकल्प आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हे विशेष आकर्षण ठरले.
या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यात जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.
#जलसंवर्धन#भूमीसुपोषण#जलतारा#नंदुरबार#TribalDevelopment#SustainableFarming#WaterConservation#AgriInnovation#RuralDevelopment#WomenEmpowerment















