
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील तत्कालीन बलशाली राजवटीच्या तावडतीतून यशस्वी सुटका या ऐतिहासिक घटनेनिमित्त ‘शिवचातुर्य दिन’ आग्रा येथे साजरा करण्यात आला. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गरुडझेप संस्थेने ‘शिवचातुर्य दिन’’ हा अभिनव उपक्रम सुरू केला असून, या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याची,चातुर्याची आणि संयमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे राजशिष्टाचार मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक आग्रा चे समन्वयक जयकुमार रावल यांनी सांगितले.
जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते तो मीना बाजार, सेवला सराय तसेच जिथे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे येताना थांबले होते, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. प्राचीन शिव मंदिर येथे मंत्री जयकुमार रावल व मंत्री भरत गोगावले यांनी भेट दिली.
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सुटका करून स्वराज्याकडे परतण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘गरुडझेप मोहीम’ पुणे येथील संस्थेच्या वतीने आग्रा ते राजगड अशी सुमारे १ हजार ३१० किलोमीटरची पायी व सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे.















