Home नंदुरबार जिल्हा श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार समाजजागृतीचे माध्यम

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार समाजजागृतीचे माध्यम

0
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार समाजजागृतीचे माध्यम
The thoughts of Shri Guru Tegh Bahadur Sahibji as a medium for social awareness

‘हिंद की चादर’ शहिदी स्मृती वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा

‘हिंद-की-चादर’ म्हणून इतिहासात अजरामर झालेले शीख धर्माचे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी स्मृती वर्षानिमित्त नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सखोल आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट, कालबद्ध व समन्वयात्मक निर्देश देत या स्मृती वर्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन हे केवळ औपचारिक न ठेवता वैचारिक जागृतीचे प्रभावी माध्यम ठरावे, असे प्रतिपादन केले.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी-गांगूर्डे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्यासह शिक्षण, नगरविकास, जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवी हक्क, सहिष्णुता आणि आत्मबलिदानाचे जे मूल्य समाजाला दिले, ती मूल्ये आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून सामाजिक व प्रशासकीय कर्तव्य आहे. या दृष्टीने सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था व सामाजिक घटकांनी एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी निर्देशित केले.

बैठकीत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धा, चर्चा सत्रे, व्याख्याने तसेच श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवन व कार्यावर आधारित माहितीपट, पोस्टर्स व साहित्य प्रदर्शन आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक ऐक्याची भावना निर्माण व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती सर्व विभागांनी आपल्या-आपल्या स्तरावर प्रसारित करावी. सोशल मीडिया, शैक्षणिक मंच, सार्वजनिक ठिकाणे तसेच कार्यालयीन माध्यमांतून या माहितीचा प्रचार-प्रसार करून जनसामान्यांपर्यंत कार्यक्रमाचा उद्देश पोहोचवावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील उपक्रम वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले. या कालावधीत जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या नागरिक, प्रतिनिधी व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, मार्गदर्शन व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागासह संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी निश्चित करून तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच सर्व कार्यक्रम लोकसहभागातून प्रभावीपणे राबवावेत, असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here