
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले. बैठकीस मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, व्यवस्थापकीय संचालक वि. म. देवराज, कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे आदी यावेळी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ लघू सिंचन प्रकल्पांना आवश्यक असलेली सुधारित प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाच्या सुधारित मापदंडानुसार देण्यात येईल. या प्रकल्पांना आवश्यक असलेला निधी लवकरात लवकर देऊन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर कामे निधी अभावी अपूर्ण आहेत. वैभववाडी तालुक्यातील ऐनारी, कणकवली तालुक्यातील शिरवल आणि कुंभवडे आदी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या सुधारित मापदंडानुसार निधी द्यावा, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.















