विविध क्षेत्रातील महिला व मुलींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना बांधली राखी; रक्षाबंधन उत्साहात साजरे
अनाथ तसेच दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचारी यांसह अनेक विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन रक्षाबंधन निमित्त त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या.
रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला व मुलींसह यंदाचे रक्षाबंधन केल्याचा अतिशय आनंद झाला आहे, अशी भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेल्या ममता बाल सदन या संस्थेच्या वतीने अनाथ मुली, पालघर जिल्ह्यातील 'सेवा विवेक' ग्राम विकास केंद्राच्या वतीने बांबू उत्पादनाच्या माध्यमातून स्वयंरोजगारीत आदिवासी महिला तसेच ब्रह्माकुमारी संस्थेच्या नेपियन सी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांच्यासह ब्रह्माकुमारी बंधू भगिनींनी राज्यपालांना राखी बांधली तसेच दिव्य संदेश दिला. आर्य समाज माटुंगा येथील शालेय विद्यार्थिनी आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेतर्फे दृष्टिहीन मुलींनी राज्यपालांना राखी बांधली.