
भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात केले.
ताज हॉटेल येथे झालेल्या या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचे स्वागत केले. भारताची प्रगती, महाराष्ट्राची आर्थिक ताकद आणि भविष्यातील विकासदृष्टी यांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विविध देशांचे महावाणिज्यदूत, कौन्सुलर कॉर्प्सचे डीन आणि पोलंडचे महावाणिज्यदूत थॉमस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
ही जगातील सर्वात प्राचीन आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींपैकी एक असून, समावेशकता, सहिष्णुता आणि विविध विचारांचा स्वीकार ही देशाची वैशिष्ट्ये आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावणारा देश म्हणून उदयास येत आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान प्राप्त केले असून, लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
राजनैतिक समुदायाशी सहकार्य, संवाद आणि संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. भारताची लोकशाही, तिरंगा आणि स्वातंत्र्याची मूल्ये जगाला प्रेरणा देत राहतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.















