
सार्वजनिक आरोग्य विभाग, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाआणि आयुष्मान भारततर्फे अवयवदान दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयांशी संवाद साधला.अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेतील किचकटपणा दूर करून रोटो-सोटो चे (रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लान्ट ऑर्गनायझेशन व ‘स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लान्ट ऑर्गनायझेशन) काम अधिक गतिमान करावे. नोंदणी प्रक्रिया वाढवावी, यासाठी प्रस्तावित चार केंद्रांचे काम पुढील महिनाभरात मार्गी लावावे, अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेबाबत जस्टिस शिंदें यांच्या अहवालातील सूचनांवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश मंत्री आबिटकर यांनी दिले.
अवयव प्रत्यारोपणासाठी कोल्हापूर, अमरावतीसारख्या ठिकाणी केंद्रे सुरू झाल्यास नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तामिळनाडूच्या धर्तीवर कॉर्पस फंडाची निर्मिती करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनीही या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त रुग्णांना सेवा द्यावी. असेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
शासन आणि सामाजिक संघटना, खासगी रुग्णालयांनी समाजातील गोरगरीबांना मदत केली तर त्यांचे जीवन सुधारू शकते. असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी केले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविन्द्रन, आयुक्त (आरोग्य सेवा) संजय काटकर, शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे, ईएसआयएसचे आयुक्त रमेश चव्हाण उपस्थित होते.















