आज उद्योग आणि व्यवसायात रोजगाराच्या दृष्टीने कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व आले आहे. एकीकडे युवकांपुढे रोजगाराची समस्या असताना दुसरीकडे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याची अडचण होती. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना त्यांचा लाभ स्थानिक युवकांना घेता यावा, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची कल्पना पुढे आली. विदर्भात मोठ्या प्रमाणात सोलर, इलेक्ट्रीक वाहन, आरोग्य तसेच लोहखनिज प्रकल्पांची इकोसिस्टीम आकारास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या विचारातूनच कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठाच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार व आधुनिक गरजांना साजेसे असे कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, युवकांना सध्या दिल्या जाणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणातून ७५ टक्के युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कौशल्य विकास केंद्र आणि प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठामुळे रोजगारक्षम बनण्याच्या दृष्टीने विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल आणि उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोहखनिज उद्योगांत गुंतवणूक येत आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील उद्योग नागपूर व विदर्भात येत असून या उद्योगांना स्थानिक पातळीवरच कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विदर्भातील मुलांना या सुविधांचा निश्चितच मोठा लाभ होणार आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
















