
देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी सर्वंकष धोरणे आणावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून या क्षेत्राची उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करण्याचेही त्यांनी सूचित केले.
राज्याच्या उद्योगविश्वाच्या वाढीसाठी धोरण तयार करताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक यांच्याशी चर्चा करावी. संबंधित उद्योग क्षेत्रातील कमतरता या धोरणातून दूर होईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या विविध उद्योगविषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे संपन्न महाराष्ट्राची निर्मिती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विकास आयुक्त (उद्योग) कादंबरी बलकवडे, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि एआय विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग आदी उपस्थित होते.















