
(नंदुरबार) राज्यात पिकांची उत्पादकता वाढवणे, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाचा गौरव करणे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी यंदापासून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या पीकस्पर्धेचे स्वरूप, पात्रता आणि इतर महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
स्पर्धेचे स्वरूप व पात्र पिके
स्पर्धेत सर्वसाधारण आणि आदिवासी अशा दोन गटांतून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विजेत्यांची निवड केली जाईल. खरीप हंगामातील एकूण 11 पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे:
• भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल.
पात्रता व अटी
• शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
• एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल.
• शेतावर भात पिकासाठी किमान 20 गुंठे आणि उर्वरित पिकांसाठी किमान 40 गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत
• मूग व उडीद पीक: 10 ऑगस्ट 2026
• भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल: 31 ऑगस्ट 2026
प्रवेश शुल्क
• सर्वसाधारण गट: ₹300/- प्रति पीक व आदिवासी गट: ₹150/- प्रति पीक
बक्षीसांचे स्वरूप (सर्वसाधारण व आदिवासी गट)
• तालुका पातळी:
प्रथम क्रमांक ₹05 हजार, द्वितीय क्रमांक ₹03 हजार व तृतीय क्रमांक ₹02 हजार
• जिल्हा पातळी:
प्रथम क्रमांक ₹10 हजार, द्वितीय क्रमांक ₹07 हजार व तृतीय क्रमांक ₹05 हजार
• राज्य पातळी:
प्रथम क्रमांक ₹50 हजार, द्वितीय क्रमांक ₹40 हजार व तृतीय क्रमांक ₹30 हजार असे आहे
आवश्यक कागदपत्रे
फार्मर आयडी (Farmer ID), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास) व बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची किंवा रद्द केलेल्या चेकची छायांकित प्रत
इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील “पीक स्पर्धा नोंदणी” या टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. किरवे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.















