ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, असे नियोजन करा!

जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षेपेक्षा कमी, सुमारे ४७ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत सुमारे ७५ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
सध्या जिल्ह्यात एकही टँकर सुरू नसला, तरी भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास आवश्यक पूर्वनियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
पीक परिस्थितीचा आढावा घेताना परतीचा पाऊस चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. संभाव्य हवामान बदलांचा विचार करून कृषी विभागाने सज्ज राहावे. पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळण्यासाठी पंचनामे व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी पाणी उपलब्धता, पीक परिस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा सादर केला.
गणेशोत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डीजे वापराबाबत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
शांतता, सलोखा आणि परंपरेतून गणेशोत्सव साजरा करूया!

