गणेशोत्सवाचा गजर असू द्या, पण डीजेचा कर्णकर्कश गोंगाट नको; पर्यावरणपूरक आणि विधायक उत्सवाची गरज
भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून ‘वसुदेव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. यासोबतच आपण साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, धर्मकारण, उद्योग, राजकारण या सगळ्या क्षेत्रात खूप चांगली प्रगती करत आहोत. राष्ट्रीय सण-उत्सव साजरे करण्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते, राष्ट्रपुरुषां विषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच भावी पिढीला त्याग, बलिदान,जबाबदारी, कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता रुजवण्याचे, संस्कार करण्याचे काम होत असते. सार्वजनिक-राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना, परस्परांवरील विश्वास, प्रेम आणि कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्या करिता, निसर्गाप्रति उपकृत होत विविध सण आणि ऊत्सव मोठ्या उत्साहाने,आनंदाने देशभर साजरे केले जातात. तसाच सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव एका चांगल्या विधायक उद्देशाने, देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून १८९३-९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. गणेशभक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यंक्रमाचीं सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वंजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला.यातून तरूणांचे देशाप्रती प्रेम,समाजाप्रती करुणा निर्माण होत गेली. समाजसेवेत, देशभक्तीत आणि राष्ट्रसेवेत यामुळे वाढ होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी, हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निघडया छातीच्या तरुण मुलां-मुलींची देशाभिमानी पिढी तयार झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले त्यासोबतच विविध प्रबोधनपर जागृतीच्या कार्यंक्रमाचे आयोजनही करण्यात येऊ लागल्याने अंघश्रद्धा, बुबावाजी व्यसनमुक्ती, लोकशिक्षण, निसर्ग संवर्धन, सामाजिक एकता, बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणशोत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे.
मेळा हा गणेशोत्सवा मधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाप्रकारातून समाजातील बदल,घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडल्या जायच्या. लोकोपयोगी विषय निवडून जागृती करणारे कार्यक्रम सादर केल जात, पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी, बतावणी, प्रहसन, एकांकिका असे भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केल्या जायचे. खास करून ग्रामीण भागात गणेशोत्सवाची यासाठी वाट पाहिली जायची. आज अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध असले तरी…त्याकाळी मेळ्याने केलेली सांस्कृतिक मशागत खुपच परिणाम आणि परिवर्तन करणारी ठरत होती. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही.. उत्सवा दरम्यान गणेश मंडळा कडून विद्यार्थी मुली मुलांसाठी तसेच महिला करिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. खरं म्हणजे शेतात राबणाऱ्या एखाद्या शेतकरी महिलेला यानिमित्ताने खेळांच्या स्पर्धेत सहभाग घ्यायची या निमित्ताने संधी मिळायची… एखादी मुलगी चांगली रांगोळी काढायची, एखादा मुलगा उत्तम चित्र काढायचा. तर मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फुर्तपणे भाग घ्यायचे पुढे हेच विद्यार्थी मग महाविद्यालयात मोठया स्पर्धा गाजवत. मिळालेल्या बक्षीसाची प्रेरणा घेऊन ते विद्यार्थी पुढे खूप मोठी प्रगती करतांना दिसायचे.
गणेशोत्सवाच्या मुख्य उद्देशाला लक्षात घेऊन प्रबोधन, जागृती करण्यासाठी या उत्सवाचा उपयोग झाला पाहिजे. आज जरी आपला देश स्वतंत्र असला,प्रगती करत असला तरी सामाजिक समस्या कमी झाल्या नाहीत. त्यामुळे उत्सवात केवळ मूर्तींची उंची कुणाची मोठी? यापेक्षा पर्यावरणपूरक, निसर्गाचे संवर्धन करणारा, प्रदूषणविरहित, निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या ऊत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव आणखी चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येऊ शकतो. याचा विचार करणे काळाची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचे कर्णकर्कश डीजेचा ध्वनिप्रदुषण टाळून पारंपारिक वाद्य मृदुंग, ढोल–तासे, लेझीम वापरले तर ते या उत्सवाची शान वाढवणारे ठरेल. सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी, सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवले तर ज्या क्रांतीकारी उद्देशासाठी गणेशोत्सव सुरू केला होता. त्याची उपयुक्तता आणि वाटचाल कालसंगत टिकून राहील. याच दरम्यान गौरीचे आगमन होत असते. त्यांना ‘महालक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे आगमन होते. घराघरात त्यांचे आगमन–पूजन–विसर्जन असा सोहळा केल्या जातो. मोठ्या उत्साहाने महिला त्यांच्यासाठी मखर, सजावट, देखावा करण्यात दंग असतात. या सोहळ्यात देखील आपण आपल्या इतिहासातील पराक्रमी, शूरवीर महिलांची माहिती आजच्या तरुण मुलीं पर्यंत पोहचवली तर त्यांची कठीण प्रसंगी, संकटात धर्याने उभे राहण्याची हिम्मत वाढेल. या पर्वणीच्या निमित्ताने आधुनिक काळात महिला–मुलींच्या हिताचे, स्वरक्षंणाचे, स्वालंबी करणाऱ्या उपक्रमाचा समावेश करता आला तर खऱ्या अर्थाने गौरीच्या आगमनाचाही चांगला उपयोग होईल.
आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते. समानता, एकता, आनंद, निसर्गाप्रति कृतज्ञता, आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टीकोन असलेले सण आम्हा भारतीयांची राष्ट्रीय भावना जागृत करणारे, उज्वल भविष्याकरीता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे उर्जाकेंद्र आहेत. सण–उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहात साजरे करणे ही मानवी मनाची, समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे. ही भूक भागवल्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपुर्णता येते असते. सणाच्या निमित्ताने व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची भेटण्याची नामी संधी मिळत असते. माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे तसेच आपले सण–उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.
गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जनाचा मोठा जल्लोष असतो. महाराष्ट्राला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेले आहे. म्हणून उत्सव, मिरवणूक असो की समारंभ आनंदच्या कोणत्याही प्रसंगी पूर्वी टाळ, मृदंग, ढोलकी, हलगी, डफडे, ढोल वाजवून किंवा शहनाई, लेझीम पथक या सारखे पारंपरिक वाद्य वापरुन तो उत्सव मोठ्या थाटात साजरा केल्या जायचा. त्यात एक नाद, माधुर्य, गोडी असायची त्यामुळे ते सगळे ऐकायला, बघायला खूपच आल्हाददायक, सुखावणारे आणि प्रेरणादायी वाटायचे. आजही आपल्याला त्याची आठवण सुखद अनुभव देत असते. गणेशोत्सव असो की महापुरुषांची जयंती अगदी डोक्यावर मूर्ती, प्रतिमा घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर गात, नाचत विसर्जन, मिरवणूक उत्साहात व्हायच्या. हल्ली आश्या कार्यक्रमाच्या प्रसंगी डीजे डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजात हे सणउत्सव साजरे होऊ लागल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे उत्सवातील गोडवा, मधुरता जाऊन त्याठिकाणी प्रदूषण, गोंगाट, उथळपणा वाढवून अनेक सामाजिक समस्यासह आरोग्याच्या संबंधित अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आणि मूर्तींची उंची वाढवून केवळ दीखाऊपणा केल्याने गणेशोत्सवाचा उद्देश साध्य होतांना दिसत नाही. हाच चिंतेचा आणि चिंतानाचा विषय आहे, उत्साहाच्या भरात आणि उन्मादाच्या जोशात आनंदाचा, ऊत्सवाचा प्रसंग एखाद्याच्या जीवनाचा शेवटचा क्षण ठरू पाहत आहे…
आजच्या वास्तव परिस्थितीचा अचूक अंदाज जर्मनीचे नोबेल पारितोषिक विजेते व प्रसिद्ध जीवाणू तज्ञ होते १९०५ मध्ये रॉबर्ट कोच यांना तेव्हाच आला होता..त्यांनी असे भाकीत केले होते…
“एक दिवस असा येईल कि जेव्हा ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या रोगांचा आपल्या भोवती फास असेल. या रोगांशी लढणं तितकच अवघड असेल जितकं गेल्या शतकात प्लेग किंवा कॉलराशी लढणं अवघड होतं” यावरून आपल्याला ध्वनी प्रदूषणाच्या आजच्या संकटाची तीव्रता लक्षात येते. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादे पलीकडील असाह्य ध्वनी म्हणजे ‘ध्वनी प्रदूषण’ होय. आपल्या देशात १२५ डेसिबल्स पेक्षा जास्त मोठ्या आवाज करणाऱ्या फटक्यावरही बंदी घातलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेणे ६५ डेसिबल्स इतका आवाज सार्वजनिक ठिकाणी निर्धारित केलेला आहे. पण नियमाला कायमच केराची टोपली दाखवून लोक उत्सवाच्या नावाखाली खुलेआम, दिवसा ढवळ्या त्याची पायमल्ली करतात. ध्वनीप्रदूषणामुळे लोकांच्या मानसिक आणि शाररीक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम होत आहे. रक्तदाब वाढणे, हृदयरोग एवढेच काय तर गर्भवती महिलानां गर्भपाता सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साधारण ८० डेसिबल्स इतका आवाज आठ तासापेक्षा जास्त आपल्या कानावर येत राहिला तर सामान्य व्यक्तीला बहिरेपणा येण्याची शक्यता अधिक असते. होते काय कि, रक्तदाब, हृदयगती, रक्तवाहिन्या संबंधीचा आणि रक्त घट्ट करणारे मज्जातंतू संप्रेरक सक्रीय करून शरीर उच्च आवाज पातळीला प्रतिसाद देते म्हणून प्रभावित लोकांना हे माहितही नसते. कि आपली कशी आणि किती हानी झाली. कालांतराने मग त्याचे परिणामच भोगावे लागतात. माणसं तर माणसं पण पशु, पक्षी, प्राणी यांच्यावर देखील डीजे डॉल्बीचा विपरीत परिणाम झाला आहे. काही पशु, प्राणी या आवाजामुळे आपली अधिवासाची जागाच बदलतात तर या सगळ्या गोंगाटामुळे अतिशय सुंदर, मंजुळ, आवाजात दिवसा गाणारे पक्षी आता तो रात्रीच्या वेळीं गात आहेत. म्हणूनच आपल्याला त्यांचा मधुर स्वर हल्ली ऐकायला मिळत नाही.
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५ अन्वये ध्वनीप्रदुषणाची मर्यादा ओलांडली तर त्यासाठी ५ वर्षाची शिक्षेची तरतूद केलेली आहे. हे जरी सगळे खरे असले तरी मनाला आवर घालून, संपूर्ण सजीवांचे प्रंचड नुकसान करणाऱ्या डीजेच्या कर्ण–कर्कश जीवघेण्या आवाजाला थांबवणे काळाची आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. निसर्ग निर्मित अनेक संकटे मानव जातीवर आक्रमण करत आहेतच त्यात डिजे डॉल्बीच्या ध्वनी प्रदूषणाचे मानव निर्मित संकट आपणच निर्माण करतोय. आपल्याला प्रत्येकाला जगण्याचा, आयुष्याचा निर्भेळ आनंद घ्यावयाचा असेल तर कर्ण कर्कश डीजेला हात जोडून रामराम ठोकण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. यातच मानवाचे, पशु, पक्षी आणि प्राण्याचे एकूण जीवसृष्टीचे हित सामावलेले आहे.

