जय राजे मंडळाचा ‘पावनखिंड’चा जागर आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प
गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि ऐतिहासिक प्रबोधन करत आहे. हीच परंपरा कायम ठेवत यंदा त्यांनी एक अतिशय भव्य आणि अंगावर शहारे आणणारा देखावा साकारला आहे.
स्वराज्याच्या बलिदानाची अमर गाथा – ‘पावनखिंड’
कलाशिक्षक राजेंद्र पाटीलयांच्या संकल्पनेतून आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल एक महिना अहोरात्र मेहनत घेऊन हा देखावा उभा केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून विशालगडाकडे जात असताना, बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी पावनखिंडीत शत्रूला रोखून धरले आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. पन्हाळगड ते विशालगड हा संपूर्ण थरारक प्रवास, लढाईचे प्रसंग या देखाव्यात हुबेहूब साकारण्यात आले आहेत. हा देखावा केवळ देखावा नसून तरुण पिढीला आपल्या इतिहासाची, बलिदानाची जाणीव करून देणारे जिवंत शिवचरित्र आहे.
या मंडळाचे सर्वात कौतुकास्पद पाऊल म्हणजे त्यांनी घेतलेले पर्यावरणपूरक निर्णय मोठेपणाच्या स्पर्धेला फाटा देत केवळ ३ फूट उंचीची, १००% शाडू मातीची सुबक मूर्ती स्थापित केली आहे.
नागरिकांना त्रास होईल अशा कोणत्याही वाजंत्री किंवा डीजे ला मंडळाने पूर्णपणे बंदी घातली आहे. विसर्जन साध्या, छोट्या स्पीकरच्या भक्तिगीतांवर होणार आहे.
मूर्तीचे विसर्जन इतरत्र न नेता, मंडपातच जागेवर करण्यात येणार आहे. आणि सर्वात स्तुत्य उपक्रम म्हणजे त्या पवित्र मातीपासून रोपे तयार करून ती भाविकांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत. एका विसर्जनातून शेकडो वृक्ष जन्माला येतील.
कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम हा सर्व भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जयपाल राजपूत पवन मराठे, हितेश पाटील, स्वप्नील पाटील, विक्की जगताप, नरेश जगताप, दीपक शिरसाठ, जितेंद्र सावळे, हेमंत सूर्यवंशी, चेतन बोरसे, गणेश जगताप, अंकुश मराठे,वैभव मराठे, निखिल पाटील तसेच मंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

