एनर्जी लिडरशिप परिषदेत अपर मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड’

भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा आणि भविष्यातील दिशा यावर मंथन करण्यासाठी ‘६ व्या ईटी एनर्जी लीडरशिप समिट २०२६‘ चे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय परिषदेत ऊर्जा क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र व विविध राज्य सरकारचे तसेच वीज क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रमुख, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री. लोकेश चंद्र यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्रातील सौर ऊर्जेच्या माध्यमातून बदलणारे ग्रामीण अर्थकारण, गुंतवणूक, रोजगार, शेतीसाठी दिवसा वीज आणि इतर सकारात्मक बदलांची माहिती दिली.
या परिषदेत सेवानिवृत्त केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. अनिल राजदान यांच्याहस्ते अपर मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर महावितरणचा पुरस्कार श्री. लोकेश चंद्र यांच्यासह कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. संतोष सांगळे, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी यांनी स्वीकारला.मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री ना. मेघना साकोरे–बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी अपर मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र यांचे तसेच महावितरणच्या सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी महावितरणचा चेहरामोहरा बदलला आहे. ऊर्जा परिवर्तनामुळे महावितरणच्या वीजदरात प्रथमच कपात करण्यात आली असून येत्या वर्षांत ते आणखी कमी होत जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे आतापर्यंत ६२५० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प पूर्ण झाले असून १७ लाख ५२ हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
यासोबतच पीएम कुसुम–बी अंतर्गत देशात आजमितीस १७ लाख ४२ हजार सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात तब्बल ६५ टक्के म्हणजे ११ लाख ५४ हजार सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. पीएम सूर्यघर योजनेसाठी महावितरणला केंद्र शासनाचे नुकतेच आठ पुरस्कार मिळाले असून राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार ५१६ घरांवर २९४७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे.
महावितरणने वीज मागणीच्या अचूक अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरु केला आहे. यासाठी विकसित केलेल्या ‘एआय/एमएल–ड्रिव्हन डिमांड फोरकास्टिंग इंजिन’ या तंत्रज्ञानाच्या कामगिरीची दखल घेत महावितरणला ‘अॅडॉप्टिंग एआय इन एनर्जी अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. महावितरणने १२ सप्टेंबर २०२४ पासून हे ‘एआय’चे स्वयंचलित तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे वीज खरेदी खर्च, मागणी–पुरवठ्यातील तफावत, ग्रीड स्थैर्य, थेट आर्थिक नियोजन आदींमध्ये मोठे यश मिळवले आहे आणि आतापर्यंत वीज खरेदीमध्ये तब्बल १२०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.

