राज्यातील शाळांमध्ये आजपासून ‘सेवा संकल्प अभियान’; विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिर्मितीची जाणीव रुजवण्यासाठी शिक्षण विभागाचा उपक्रम!
या अभियानांतर्गत ‘विकसित भारत–२०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम तसेच स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, जलसंवर्धन, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, फिट इंडिया, वीरगाथा, दिव्यांगजन सहाय्य, मतदार जागृती, व्होकल फॉर लोकल, व्यसनमुक्ती आणि पोषण व ॲनिमिया जनजागृतीसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहकार्य यांसारखे उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
प्रत्येक शाळेने स्थानिक गरजेनुसार किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करावी. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग राहणार आहे. अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ ही भावना रुजविण्यावर भर देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

