सेवा संकल्प अभियाना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन
सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सेवा, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यांमध्ये ‘संवाद सेतू’च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. योजनांच्या लाभार्थ्यांचा सहभाग वाढवून शासनाच्या योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती संवादाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, अनाथालय व वृद्धाश्रम भेटी, महिला आरोग्य व स्वच्छता, डिजिटल साक्षरता, दिव्यांगजन सहयोग तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विभागाचे अधिकारी व कर्मचारी शहरी तसेच ग्रामीण भागात नागरिकांशी थेट संवाद साधून जनजागृती करणार आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांच्या यशोगाथा, व्हिडीओ, रिल्स आणि लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया संकलित करून डिजिटल माध्यमातून व्यापक जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा आणि अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

