शिक्षक भरतीत १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या शिक्षकांचे मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन
पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय या प्रकारात निवडीसाठी एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) अंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर तसेच एसएमएसद्वारे निवडीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने निवड झालेल्या शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये व मूल्यांची जडणघडण करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
