‘खेलो इंडिया डायलॉग २०२६’मधून युवकांना क्रीडा सहभागाचे आवाहन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलोइंडिया डायलॉग २०२६’च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील युवकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मुंबईत हा कार्यक्रम आयआयटी मुंबईच्या पी.सी. सक्सेना सभागृहात आयआयटी मुंबई आणि माय भारत मुंबई यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांच्या संवादात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘खेलो इंडिया डायलॉग’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या दैनंदिन जीवनात क्रीडा आणि शारीरिक व्यायामाचा समावेश करण्याचे आवाहन केले.

देशातील क्रीडा परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच भारतात मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
२०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताच्या तयारीच्या दृष्टीने देशभरातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या संवादामुळे युवकांना भारताला जागतिक स्तरावरील मजबूत क्रीडा राष्ट्र बनविण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाची माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आंतरराष्ट्रीय हेप्टॅथलॉनपटू नंदिनी अगासरा, संचालक प्रा. शिरीष केदारे, माय भारत महाराष्ट्राचे राज्य संचालक अमित पुंडे आणि माय भारत मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘नशामुक्त आयआयटी मुंबई’ निर्माण करण्यावर भर दिला. युवकांनी अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.