संवादवारी डिजिटल चित्ररथाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे सदिच्छा भेट दिली
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान त्यांनी डिजिटल चित्ररथातील विविध आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आषाढी वारीनिमित्त ‘संवाद वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या योजनांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल सादरीकरणाची पाहणी केली. तसेच चित्ररथामध्ये उपलब्ध असलेल्या एआय आधारित चॅटबॉट प्रश्नमंजुषेचा अनुभव घेत शासनाच्या विविध योजनांबाबत प्रश्न विचारले. वारकऱ्यांना सोप्या आणि आकर्षक पद्धतीने माहिती देणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘संवाद वारी’ ही नागरिकांशी प्रभावी संवाद साधणारी संकल्पना असून, डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या योजना अधिक सुलभ, आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही वारीसारख्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेला हा डिजिटल चित्ररथ अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना त्वरित आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
#पंढरपूरवारी२०२६#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#महाराष्ट्रशासन#शासकीययोजना#वारी#PandharpurWari2026

