‘कापूस क्रांती’ अभियान: कृषी सचिव आणि कृषी आयुक्तांच्या उपस्थितीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतला आढावा
कापूस हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, योग्य पीक व्यवस्थापन तसेच शास्त्रीय पद्धतींचा प्रभावी वापर आवश्यक आहे. या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत अभियानाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषी, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन आणि विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बैठकीत दिले.
राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, उत्पादकता व उत्पादन वाढवणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यास्तव कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक मार्गदर्शन व तंत्रज्ञान पोहोचविणे, उत्पादन क्षमतेत वाढ करणे आणि कापूस उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.
कापूस क्रांती या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

